क्रांतिवीर ज्ञानमंदिर हे पद्मभूषण अण्णांचे खरेखुरे स्मारक – कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी
म्हसवड दि. १६
माण तालुक्यातील म्हसवडच्या माळरानावर डौलाने उभे असणारे क्रांतिवीर संकुल व ज्ञानमंदिर हेच पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे खरे स्मारक असल्याचे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी यांनी म्हसवड येथे केले.
हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या 104 व्या जयंती च्या पूर्वसंध्येला क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे जीवनपट क्रांतिवीर नागनाथ अण्णांचा हा प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नाईकवडी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. यावेळी क्रांतिवीर शाळेचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, आत्मगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने, क्रांतिवीर सीबीएसई चे प्राचार्य विन्सेंट जॉन , नूतन शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम जाधव, शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी यांनी कृषिरत्न विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर व सहकाऱ्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. देशाच्या स्वातंत्र्याचा साठी रक्त सांडणाऱ्या पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे चिरंतर स्मारक ज्ञानमंदिराच्या माध्यमातून म्हसवड येथे उभे केल्याबद्दल बाबर दाम्पत्यांना धन्यवाद दिले.
पुढे बोलताना बाळासाहेब नायकवडी म्हणाले क्रांतिवीर अण्णांनी कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त यांची चळवळ उभी केली, . तेरा दुष्काळी तालुक्याची पाणी संघर्ष चळवळ उभी करून शेतकऱ्यांना न्याय दिला. क्रांतिवीर अण्णा हे दिनदलित, कष्टकरी, शेतमजूर व कामगारांचे दैवत होते. सहकार, कृषी, दुग्ध व्यवसाय ,शिक्षण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात त्यांचे अलौकिक कार्य असल्याचे नायकवडी यांनी सांगितले. अण्णांचे बालपण, घरची परिस्थिती, शालेय शिक्षण, तरुण वयात ब्रिटिशा विरुद्ध केलेला उठाव , क्रांतिसिंह नाना पाटील, व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबतचा जिव्हाळा , देशभक्ती , धुळे खजिना लूट, सातारा जेल च्या भिंतीवरून मारलेली उडी, भूमिगत चळवळ इत्यादी ऐतिहासिक संदर्भातील अंगावर शहारे आणणारा जीवनपट बाळासाहेब नायकवडी यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडला.
विद्यार्थ्यांनो तुम्ही भाग्यवान आहात. अण्णांच्या नावाने सुरू असणाऱ्या शाळेत तुम्ही शिकत आहात,त्यांचा वसा आणि वारसा जपून देश बलवान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन बाळासाहेब नायकवडी यांनी केले. यावेळी प्रा. विश्वंभर बाबर यांनी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या प्रगती बद्दल , तसेच नागनाथ अण्णांच्या सहवासातील अनेक आठवणी सांगितल्या. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून संकुलाच्या उपक्रमशीलतेची माहिती दिली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर पद्मभूषण नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुलोचना बाबर यांनी केले उपस्थितांचे आभार अनिल कुमार काटकर यांनी व्यक्त केले.