सातारा – सोलापुर महामार्गावर आणखी एक अपघात, पती – पत्नी गंभीर
म्हसवड दि. २७
सातारा–लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता रामचंद्र शेळके (वय 47) आणि रामचंद्र निवृत्ती शेळके (वय 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा) हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत, ते आपल्या गावी माळशिरस येथे जात असताना माण तालुक्यातील पळशी फाटा येथे रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला. परिणामी त्यांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात झाला.
या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर डॉक्टर माधुरी कुचेकर यांनी तात्काळ प्राथोमोच्चार केले.
दरम्यान, सातारा–लातूर महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबरीकरण आणि अपुरी दुरुस्ती यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या परिस्थितीसाठी रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे.
तर सातारा – लातुर हा महामार्ग माण तालुक्यासाठी सध्या मृत्युमार्ग बनल्याचे दिसुन येत आहे, सकाळी याच महामार्गावरील खराब रस्त्यामुळे चारचाकीचा अपघात होवुन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असतानाच अन्य एका ठिकाणी याच महामार्गावर अपघात होवुन पती, पत्नी गंभिररित्या जखमी होण्याची घटना घडल्याने रस्ते विकास महामंडळावर नागरिक चांगलेच तोंडसुख घेत आहेत, तर या विभागाला जाग येईल काय असाही प्रश्न माण वासिय विचारु लागलेत.
स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, “रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करून रस्त्यांची दुरुस्ती करावी,” अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.०००