पाण्यासाठी म्हसवडकरांचा टाहो, सत्ताधारी व प्रशासन ऐकेल का, हो
म्हसवड दि. २३ ( महेश कांबळे )
म्हसवड शहरात सध्या पालिकेकडुन होणार्या पाणी पुरवठ्यामध्ये कमालीचा विस्कळीतपणा आला असल्याने १० /१२ दिवसांनी म्हसवडकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे, त्यामुळे नागरीकांना खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन सर्वसामान्य जनता ही पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशा टाहो फोडु लागली आहे, मात्र सुस्त प्रशासन व मस्त सत्ताधार्यांना या सामान्य जनतेचा टाहो ऐकु येत नसल्याने सामान्य जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.
म्हसवड शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सामान्य जनतेवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे, शहरांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील जनता तर पाण्यासाठी भटकंती करु लागली आहे, मात्र शहरातील जनतेलाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरासाठी जिवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित असली तरी ही योजना आता कालबाह्य झाल्याने या योजनेवरील जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील पालिकेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपुर्वी याच मंत्री गोरे यांनी म्हसवडकरांना २४/७ असे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या याच शब्दावर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन म्हसवडकर जनतेने २१ / ० अशा स्पष्ट बहुमताने पालिकेची सत्ता ताब्यात दिली आहे. वास्तविक पाहता म्हसवड शहरासाठी मंत्री गोरे यांनी विशेष प्रयत्न करुन वाढीव सुधारीत जल योजना मंजुर करुन त्यासाठी म्हसवड पालिकेला कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे, या योजनेंतर्गत शहराला पिण्याचे पाणी २४/७ असे राहणार असल्याचे अनेकवेळा सांगण्यात आले आहे. या निधीतुन पालिका हद्दीत गतवर्षीच सर्वत्र नवीन जल वाहिनी टाकण्यात आली आहे, तर त्यावरुन प्रत्येकाला नवीन कनेक्शन देण्यासाठी तजवीज ही करुन देवली आहे, नवीन जल वाहिनी टाकल्याने लवकरच आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मिटेल या आशेवर राहुन म्हसवडकर जनतेने पालिकेत मंत्री गोरे यांच्या ताब्यात एकहाती सत्ता दिली आहे. ही सत्ता देवुनही ३/४ महिने लोटले आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे, शहराचा पारा जवळवास ४० अंश डिग्री सेल्सियस कडे चालला आहे. सामान्य जनतेला याचा खुप मोठा त्रास होत आहे. अंगातुन घामाच्या धारा निघत असल्याने घशाला कोरड मात्र पडत आहे. मात्र घशाला पडणारी कोरड थांबवण्यासाठी लागणारे पाणीच कोठे उपलब्ध नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
खरे तर म्हसवड शहरासह परिसरातील ग्रामीण जनतेला दुष्काळ हा काही नवा नसला तरी यापुर्वी पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा येथे गंभीर प्रश्न निर्माण होत होता, तो प्रश्न हाती घेवुनच मंत्री गोरे यांनी येथील जनतेला साद घातली आहे, त्यांना प्रतिसाद येथील जनतेने खुप मोठ्या प्रमाणावर दिला आहे. येथील शेतीपाण्याचा प्रश्न मंत्रीमहोदयांनी मार्गी लावला आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबीत असल्याने सर्वसामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरु आहेत. मंत्री गोरे यांना संपूर्ण राज्याची काळजी घ्यावी लागत असली तरी राज्य म्हणजे पै – पाहुणे तर म्हसवड व माण तालुका हा त्यांच्यासाठी घर व घरातील सदस़्यांप्रमाणे आहे, त्यामुळे पै – पाहुणे तुपाशी अन् घरातील उपाशी असे होवु नये अशी अपेक्षा येथील सामान्य जनता व्यक्त करीत आहे.
२४/७ राहुद्यात निदान ४ दिवसांतुन तरी एकवेळ आम्हाला पिण्याचे पाणी द्या एवढीच मागणी सर्वसामान्य म्हसवडकर जनता करीत आहे, सामान्य जनतेची ही मागणी पुर्ण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे.
प्रतिक्रिया –
युध्द पातळीवर काम सुरु आहे – मुख्याधिकारी डॉ सचिन माने –
शहराला पिण्याचे पाणी ८/१० दिवसांतुन येत असल्याने त्रस्त नागरिक आता आपल्या नगरसेवकांना आडवुन याचा जाब विचारु लागली आहे, याबाबतीत आम्ही थेट पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, सध्या त्यावर युध्द पातळीवर काम सुरु आहे, उन्हामुळे जलवहिन्या फुटण्याचे प्रकार वाढत आहेत, मात्र लवकरच नवीन जलवाहिनीतुन शहराला पिण्याचे पाणी सोडले जाईल, सर्वत्र जल वाहिनी टाकण्यात आली आहे, या जल वाहिनीतुन पाणी सोडुन टेस्टिंग करण्याचे काम राहिले आहे. लवकरच हे टेस्टिंग करुन म्हसवड करांना मुूबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. तो पर्यंत प्रत्येक ठिकाणी मागणीनुसार पालिकेकडुन पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिला जात आहे.०००