चार्या, पाण्याविना मुकी बछडी फोडतायेत हंबरडा
म्हसवड दि. ८ ( महेश कांबळे )
माण तालुक्यातील म्हसवड येथे असलेल्या मेगासिटी लगतच्या वनीकरणात काही निर्दयी व्यक्तींनी जर्सी गायींची दोन बछडी आणुन सोडली आहेत, सध्या ही दोन खोंड चार्या व पाण्याविना तेथेच हंबरडा फोडत आहेत. याठिकाणाहुन जाणार्या रस्त्यावर येवुन ते थांबत असुन येथुन जाणार्या प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे ते हंबरडा फोडत धावत आहेत, तर ये – जा करणार्या पादचार्यांच्याही ते मागे जात आहेत, जणु आम्हाला तुमच्या घरी न्या अशी ते विनवणी करीत आहेत.
सध्या बाजारपेठेत खोंडाना मागणी नसल्याने त्याची विक्री होत नाही म्हणुन पशुमालक अशा खोडांना आणुन सोडुन देत आहेत. पशुमालक त्यांना सोडुन मोकळे होत असले तरी अशा बछड्यांचे चारा, पाण्याविना होत असलेले हाल, त्यांचा यासाठी सुरु असलेला हंबरडा ऐकुन अनेकांना हळहळ वाटत आहे. सध्या ज्या परिसरात हे बछडे फिरत आहेत त्याठिकाणी भटक्या श्वानांचा मोठा वावर आहेच या शिवाय लांडगेही फिरत असल्याने ही बछडी त्यांची शिकार होण्यापुर्वीच वनविभागाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खरे तर अशी निरागस खोंड यापुर्वी अनेकदा काही निर्दयीपणे कत्तलखान्याकडे जात होती, मात्र आता गावोगावी गो रक्षक निर्माण झाल्याने या मुक्या जनावरांचे प्राण निश्चित पणे वाचत आहेत, मात्र त्यांचे चार्या व पाण्याविना हाल होत आहेत. अशा जर्शा खोंडाना बाजारपेठेत मागणी नाही त्यामुळे त्याची विक्री होत नाही मग त्यांना नुसतेच संभाळायला कोणी पशुमालक तयार होत नाही म्हणुन ते अशा मुक्या जनावरांना अशा ठिकाणी मरणयातना भोगण्यासाठी सोडुन देत आहेत.
अशा ठग पशु मालकांवर कारवाई तर झालीच पाहिजे, या शिवाय वनविभागानेही ठिकठिकाणी सिसिटीव्ही बसवल्यास अशा प्रकारांवर आळा बसेल तर निर्दयी पशुमालकावर ही कारवाई करता येईल अशी मागणी जोर धरत आहे.