म्हसवड दि. ७ ( महेश कांबळे )
माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पोलीस स्टेशन मध्ये गत २ महिन्यांपासुन अधिकारीच नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची मोठी गैरसोय होत, आहे तर पोलीस स्टेशन ला अधिकारीच नसल्याने सध्या हे पोलीस स्टेशन भटक्या श्वानांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.
राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाल्लेकिल्यातील हे अत्यंत महत्वाचे शहर म्हणुन ओळखले जाते, याच म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत ४२ छोट्या- मोठ्या गावांचा समावेश आहे, तर या पोलीस स्टेशन हद्दीत ८ बीट येत असुन त्यासाठी ५१ पोलीस कर्मचार्यांची नियुक्ति आहे. तर दोन पोलीस अधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत, यापैकी एक पि. एस. आय. व एक ए.पी. आय. असे २ अधिकारी नियु्क आहेत, मात्र १४ फेब्रुवारी रोजी या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ए.पी. आय. अक्षय सोनवणे यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली, मात्र त्यांची बदली होवुन जवळपास दोन महिने लोटले तरी अद्यापही त्यांची जागी एक सक्षम व जबाबदार अधिकारी न आल्याने पोलीस स्टेशन सध्या रामभरोसे सुरु असल्याचा प्रत्यय येत आहे, शहरात ११ एप्रील रोजी महात्मा फुले व १४ एप्रील रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते, याकाळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी ही म्हसवड पोलीसांची असते, ही जबाबदारी यंदाही चोखपणे पार पाडण्याची जयंतीपुर्वीच येथे जबाबदार पोलीस अधिकार्याची नियुक्ति व्हावी अशीच अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनता करीत आहे.
वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड शहरातील एकमेव पोलीस स्टेशन आहे की ज्या पोलीस स्टेशन मध्ये गत २ महिन्यांपासुन पोलीस अधिकारी नाही, सातारा पोलीस मुख्यालयात जवळपास असे ११ स.पो.नि. अतिरिक्त आहेत की त्यांच्याकडे अद्याप कोणत्याही पोलीस स्टेशन चा अधिकृत कार्यभार नाही अशीही माहिती समोर येत आहे, मात्र त्यांच्या नियुक्ति ला हिरवा कंदील अद्याप मिळाला नसल्याने ते मुख्यालयातच थांबलेले असल्याचे समजते. खरे तर सातारा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले म्हसवड शहर आहे, या शहराच्या पुढे सोलापुर जिल्हा सुरु होतो सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत आजवर मोठ्या ताकतीने हे म्हसवड शहर उभे राहिलेले आहे, तर ना. गोरे हे ज्या सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात त्यांना सातत्याने याच म्हसवड शहरातुन जावे लागते, अशा महत्वपूर्ण शहरातील पोलीस स्टेशन ला अधिकारी नसणे हे पोलीस दलासाठी पण खेदाची बाब आहे.
यापुर्वी येथील पोलीस स्टेशन ला आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकार्यांचे लॉबींग सुरु असल्याची माहिती समोर येत आहे, यावेळी सुध्दा याठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण फिल्डींग लावुन बसलेले आहेत, मात्र येथे नेम नेमका कोणाचा लागतोय हे पाहणे जरी औत्सुक्याचे ठरणार असले तरी येथे जो अधिकारी येईल तो निश्चितच ना. गोरे यांच्या मर्जीतील असणार यात तिळमात्र शंका नसली तरी तो अधिकारी हा सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा असावा एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनतेतुन व्यक्त होत आहे.
चौकट –
प्रभारीवरच सर्व भार –
गत २ महिन्यांपासुन म्हसवड पोलीस स्टेशन चा अतिरिक्त भार हा दहिवडी येथील स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी त्यांची दहिवडी, म्हसवड अशी धावपळ करताना मोठी दमछाक होत आहे, दहिवडी, म्हसवड, व शिखरशिंगणापुर चे औटपोष्ट असा संयुक्त कारभार सध्या दराडे पहात आहेत.
पोलीस स्टेशन मध्ये चक्क भटक्या कुत्र्याचा वावर -
सेनापति नसल्यावर ज्याप्रमाणे सैन्य ही निर्धास्त होतं अगदी त्याप्रमाणेच म्हसवड पोलीस स्टेशन ची अवस्था झाली आहे, येथे प्रमुख अधिकारीच नसल्याने सर्व कार्यरत कर्मचारी ही निर्धास्तपणे वावरत आहेत, त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये कोण येतंय जातयं याकडेही त्यांचे लक्ष नसल्यानेच याचा फायदा चक्क भटक्या श्वानांनी घेतला असुन भरदिवसा भटके श्वान पोलीस स्टेशन मध्ये निवांतपणे पडलेले दिसत होते, मात्र त्याला बाहेर काढण्याची साधी तसदी कोणीही घेत नसल्याने हे पोलीस स्टेशन भटक्या श्वानांचा अड्डा तर बनले नाही ना ? असा प्रश्न येथे आलेल्यांना पडल्यावाचुन रहात नाही.०००
