म्हसवड दि. ९
माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पालिकेच्या ढिसाळ व तोकड्या नियोजनामुळे म्हसवडकर नागरीकांना पिण्याचे पाणी 7 ते 8 दिवसाच्या अंतराने येत असून पाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. याबरोबरच नवीन पाईपलाईन मार्फत पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा अशी ही मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे करीत याकडे आता थेट जिल्हाधिकार्यांनीच लक्ष घालण्याचे साकडे प्रा. बाबर यांनी घातले आहे.
म्हसवड शहरवासीयांना पिण्याचे पाणी नियमित स्वरूपात मिळावे तसेच नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी याबाबतचे निवेदन शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी माननीय संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांना नुकतेच सातारा कार्यालयात दिले. म्हसवड ची जुनी व नवीन पाणीपुरवठा योजना तसेच प्रशासनाचा नाकर्तेपणा याबाबत विश्वंभर बाबर यांनी तपशीलवार माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. म्हसवड शहरातील अनेक भागाला 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळत आहे. सदर पाणी सोडण्याचा कालावधीही विविध ठिकाणी विविध कारणामुळे नेहमीच विस्कळीत व वाढीव कालावधी चा होत असतो. उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढती गरज आहे, मात्र पाणीपुरवठा कमी व खूप मोठ्या अंतराने होत असल्याने जनता हवालदिल झाली आहे. त्यातच जुन्या पाईपलाईनच्या अनेक ठिकाणी होणाऱ्या गळती तक्रारीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. म्हसवड शहरासाठी 80 कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना अंदाजे तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली. मात्र या योजनेचा पूर्णत्वाचा व कामाचा वेग अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सब लाईनचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले तरी मुख्य पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे तसेच झालेले काम झालेले काम तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. शासनाने योजना मंजूर केली, निधी दिला मात्र ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे तसेच अयोग्य व्यवस्थापना मुळे जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी निवेदनात म्हटलेले आहे. पाईपलांच्या तांत्रिक अपूर्णता कारणावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची ? केवळ खर्चाची बिले काढण्यापेक्षा जनतेचे हित पाहणे गरजेचे असल्याचे प्रा. बाबर यांनी स्पष्ट केले आहे. जुन्या योजनेबरोबरच नवीन नळ पाणीपुरवठा योजने मार्फत पिण्याचे पाणी तातडीने सुरू करावे अशी मागणी ही विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.०००
